पूर्व विदर्भात पावसाचा हाहाकार:गोंदियातील वाघ नदीच्या पुरात डिझेल टँकर वाहून गेला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
गोदिंया जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी दुसर्या दिवशी कायम असून जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे देवरी, सालेकसा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गोंदिया येथे पावसामुळे घर कोसळल्याने 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर एक पेट्रोल टँकर वाघ नदीत वाहून गेलेला आहे. दरम्यान मुसळधार पावसाने नागरिकांची रात्रीपासूनच तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळात सुद्धा पाणी आल्याने यांच्या मूर्तीच्या समोर पाणी साचलेले आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना दमदार पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीसह आसपासच्या गावांना सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक वस्त्यांमध्ये साचले पाणी नगर परिषदेने पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांचा उपसा न केल्याने सोमवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले होते. तर काही नागरिकांच्या घरात पाणी साचल्याने त्यांची तारांबळ उडाली होती. तर अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याचे चित्र होते. शहरातील अवंतीबाई चौकात असलेल्या संयोग हॉस्पिटलमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ तिघांना वाचवले देवरी तालुक्यातील शिरपूर गंगा देशलहारे सतनामी, देशलहारे हरी सतनामी,अनिल सुरजभान बागडे या तिघांना रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. जिल्ह्यात रात्रभर आलेल्या जोरदार पावसामुळे अतिवृष्टी झाली असून शहरातील नाले ओसंडून वाहत आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक वार्डातील रस्ते जलमय झाले असून घरात पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. त्यातच फुलचून नाका येथील दुर्गाभैय्या पोहेवाल्याच्या मागे नाल्याला लागून असलेले संपूर्ण घर कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. गोंदिया शहरातील राणी अवंतीबाई चौकात ३ फूट पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. तसेच शेजारील परिसर जलमय झालेला आहे. राजाभोज कॉलनी सुध्दा पाण्याखाली आली आहे. अंडरग्राऊंड पुलाखालीही पाणी साचले आहे. देवरी तालुक्यातील शिरपूर येथून तीन लोकांना रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. गंगा देशलहारे सतनामी (वय ४०), देशलहारे हरी सतनामी (वय ४५) आणि अनिल सुरजभान बागडे (वय ३५) अशी तिघांची नावे आहे. धरणांचे २४ दार उघडले सिरपूर धरणाचे ०७ दरवाजे, पुजारीटोला धरणाचे १३ दरवाजे तर कालीसरार धरणाचे ४ दरवाजे उघडले आहे. सिरपूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे धरण नियंत्रणाकरीता ७ वक्रद्वारातून (गेट) १.८० मी.ने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामधून १०१२.७३ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने धरणाचे १३ दरवाजे १.२० मी. ने उघडण्यात आले आहे. यामधून ११३७ क्युमेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. कालीसरार धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने ४ वक्रद्वार (गेट) ०.९० मी. ने उघडण्यात आले आहे. यामधून ३३४.०९४ क्युमेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

What's Your Reaction?






