छत्रपती संभाजीनगरमध्ये 94 तलाठ्यांची निवड:पण प्रत्यक्ष 5 जणांचीच नियुक्ती, इतर जिल्ह्यांतील उमेदवार कर्तव्यावर रुजू
मार्च २०२३ मध्ये तलाठ्याची निवड यादी प्रसिद्ध झाली होती. छत्रपती संभाजीनगर वगळता उर्वरित जिल्ह्यातील तलाठी कामावर रुजू झाले आहेत. येथे अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. १५ ऑगस्ट रोजी केवळ ५ उमेदवारांना नियुक्ती दिली. उर्वरित ८९ उमेदवार आजही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. तलाठी निवड यादीनंतर लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया रखडली होते. आचारसंहिता संपून चार महिने पूर्ण होत आले आहेत. प्रशासनाने निवड यादीतील उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही. फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये १५३ पैकी ५९ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली होती. ९४ उमेदवारांनी सुधारीत निवड यादीतून वगळल्यामुळे त्यांनी ‘मॅट’मध्ये धाव घेतली. मॅटने प्रलंबित तलाठी भरती प्रक्रिया प्रकरणी जैसे थे आदेश दिले. त्यामुळे प्रशासनाने भरती प्रक्रिया थांबविली. भरती प्रक्रियेची जाहिरात १ वर्षापूर्वी आली होती. इतर जिल्ह्यांत मुंबई मॅट निर्णयामुळे भरती सुरू पूर्ण झाली आहे. परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने याबाबत निर्णय घेतला नाही. निवड यादीतील काही उमेदवार हे अंशकालीन पदवीधर तसेच माजी सैनिक असून त्यांचा शासकीय सेवेचा कालावधी ३ ते ९ वर्ष राहिलेला आहे. असे असताना वर्षभरापासून भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यामुळे निवड झालेले उमेदवार तणावात आहेत. १२ ऑगस्टला मंत्री सत्तार यांचे पत्र मार्च २०२३ मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र द्यावेत, यासाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना पत्र दिले. या ५ जणांनाच मिळाली नियुक्ती पालकमंत्र्यांच्या पत्राची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी १५ ऑगस्टला गणेश नारायणकर, रूपाली गवळी, पल्लवी राऊत, सुरेश मस्के, सुधाकर कासार यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते तलाठी नियुक्ती पत्र देण्यात आले. मात्र, उर्वरित ८९ उमेदवार निवड होऊनही नियुक्ती मिळत नसल्यामुळे हवालदिल झाले आहेत.

What's Your Reaction?






